Tuesday, January 31, 2006

बोका !

करून झाला विचार पक्का
मनात माझ्या तुझाच छक्का

छछोर मांजर खट्याळ बोका
कुठे न श्रीखंड फस्त चक्का

उद्या दुपारी तुझी सुपारी
खुशाल मारू हवेत फक्का

सफेद पाद्री सफेद सेना
उजाड काशी उजाड मक्का

तुझी लढाई तुझी चढाई
तुला न बुक्की मलाच धक्का

सभेत श्रोते तुझे नव्याण्णव
मला बिचारा उगाच टक्का

- माफी
(Manogat.com)

Monday, January 30, 2006

नेताजींना रशियात फ़ाशी दिले?

नेताजींचा मृत्यु हे अजुनही न उकललेले गूढ आहे. असंख्य हिंदुस्थानियांचा असा दृढ विश्वास होता आणि आहे की नेताजी त्या तथाकथित विमान अपघातात मृत्यु पावलेच नाहीत! त्या नंतर अनेक अफ़वा प्रसृत झाल्या होत्या.

आता पर्यंत शाहनवाज खान व खोसला या दोन आयोगांना देखिल कोणताही १००% सिद्ध असा कुठलाच ठाम निष्कर्ष सप्रमाण मांडता आला नव्हता. आता मुकर्जी आयोग अजूनही ठाम निष्कर्षाप्रत आलेले नाही, त्यांना अनेक अडचणी येत आहेत.

आजच्या म.टा. मध्ये एक खळबळजनक सिध्दांत मांडला गेला असल्याचे प्रतिपादन केले गेले आहे. नेताजी रशियात गेले व स्टॅलिनने त्यांना जपान या राष्ट्राच्या सहकारी सेनेचा प्रमुख म्हणून नेताजींना फ़ाशी दिले असा नवा सिध्दांत आहे. मात्र या बाबत कमालीची गुप्तता का? हे व असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.

सविस्तर वृत्तांत

Tuesday, January 24, 2006

मराठी विश्व.

काही दिवसापुर्वी एक आंग्ल पंडित आपल्या देशामध्ये 'इग्रंजी भाषेची भारतातील स्थिती' या विषयावर अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये आले होते.त्यांनी एक खुपच मार्मिक शेरा दिला होता. त्यांच्या मते इंग्रजीचे प्रस्थ पुर्ण जगामध्ये तर वाढत आहे हि वस्तुस्थिती आहेच, पण इतर देशामध्ये आणि भारतीय लोकांमध्ये एक यासंबधी गुणात्मक भेद आहे. भारतीय लोक इग्रंजी भाषा त्याच्या बारकाव्यासह तर शिकतातच, पण कोठेतरी आपल्या मुळ भाषा जपण्याचा यथायोग्य प्रयत्नही करतात. ही जाणीव युरोपातील, अमेरीकेतीला भल्या भल्या लोकांनाही नसते. हे वाचुन माझ्या मनाचे मळभ काही अंशी दुर झाल्यासारखे वाटले.
आजही आपल्या आजुबाजुला, मराठी भाषेच्या संबधी काहीनाकाही सदोदित चालु असते. संमेलने, पुस्तकांची प्रदर्शने, चर्चा, परीसंवाद, शाळा-महाविद्यालयातील काहीनाकाही उपक्रम इत्यादी इत्यादी.

मायमराठीचे अगत्य असु द्यावे, हि प्रार्थना.

Monday, January 23, 2006

पुण्याची 'खाद्य' श्रद्धास्थानं!

पुणेकर होण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगणं आवश्यक आहे - पु. ल. देशपांडे

पुलंच्या या उक्तीला अनुसरून मला लहानपणापासूनच पुण्याच्या 'खाद्य' श्रद्धास्थानांविषयी कमालीचा, शाश्वत, निरंकुश, अफाट इ इ थोडक्यात जाज्वल्य अभिमान वाटत आला आहे. थांबा. ही टायपिंग मिष्टेक नाही! मला आद्य श्रद्धास्थानं म्हणायचं नसून खाद्य श्रद्धास्थानंच म्हणायचं आहे. आणि खाद्य श्रद्धास्थानं हीच पुण्याची आद्य श्रद्धास्थानं आहेत असा माझा दावाही आहे. कारण वडा, भजी, मिसळ भेळी पासून ते पंजाबी, चायनीज, काँटिनेंटल, थाई पर्यंत अनंत प्रकारची खाद्यं अनंत ठिकाणी जाऊन मटकावणाऱ्या पुणेकरांची आद्य श्रद्धास्थानं ही केवळ खाद्यच असू शकतात!

'वदनी कवळ घेता' म्हणायच्या वयापासून ते 'वदनी कवळी येण्या'च्या वयापर्यंतचे सर्व पुणेकर आठवड्यातून एकदातरी कुठेतरी बाहेर जाऊन काही ना काही फस्त करून येतात. सलग आठवडाभर रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सर्व वेळ फक्त घरीच (स्वतःच्या) उदरभरण (स्वतःचं) करणारी व्यक्ती ही खरीखुरी पुणेकर असूच शकत नाही! असे हे पुणेकर नेमके कुठे जातात आणि काय काय काय मटकवून येतात याचा माझ्या नजरेनं (वा जिव्हेनं!!) शोध घ्यायचा हा प्रयत्न...

श्रद्धास्थान १ - मिसळ

पुण्याचं अत्यंत लाडकं खाद्य श्रद्धास्थान म्हणजे मिसळ! जगात मिसळीच्या दोनच प्रमुख जाती... पुणेरी मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ. (अलिकडेच कुठेतरी 'चायनीज मिसळ' हा प्रकार मेनूकार्ड वाचताना समोर आला... पण अशा संकरित जातींकडे जातीचा पुणेकर जातीनं दुर्लक्ष करतो!). कोणतीही मिसळ बनवताना त्यात (स्वाभाविकतःच) अनेक गोष्टी मिसळल्या जात असल्या तरी मिसळीची चव ठरवणारा एकच प्रमुख घटक असतो. कोल्हापुरी मिसळीत या मुख्य घटकाला 'तर्री' म्हणतात तर पुणेरी मिसळीत याला 'शांपल' म्हणतात. कोल्हापुरी तर्री ही कांदा-खोबऱ्याच्या वाटणानी बनते आणि त्याची चव ही कोल्हापुरी मटणाच्या रश्शाशी बऱ्यापैकी साधर्म्य सांगणारी असते. पुणेरी मिसळीचं शांपल मात्र एक संपूर्णतः वेगळी आणि स्वयंभू गोष्ट असते. जसे पुण्यातले वेगवेगळ्या जाती-धर्मा-पंथाचे लोक पुणेरीपणाच्या एका विशिष्ट स्वभावधर्मानं एकत्र बांधलेले असतात तसं कांदा-बटाटा-टमाटोचं हे शांपल एका आगळ्या वेगळ्या स्वादानं दरवळणारं असतं!

पोहे, बटाटा भाजी, फरसाण आणि शांपलनं भरलेली आणि शेव, कांदा, कोथिंबीरीनं सजलेली ही वैशिष्ट्यपूर्ण पुणेरी मिसळ खाण्यासाठी पुण्यात तीन श्रद्धास्थानं आहेत. तुळशीबागेत 'श्रीकृष्ण', सदाशिव पेठेत 'श्री' आणि पत्र्यामारुतीपाशी 'बेडेकर'! या तीनही ठिकाणची समान वैशिष्ट्य म्हणजे - अत्यंत अपुरी, अंधारी जागा... ग्राहकांची जमेल तितकी गैरसोय... रोज लागणारा 'मिसळ संपली' चा बोर्ड!... आणि तरीही या सर्वांवर मात करणारी अत्यंत चवदार, चटकदार अप्रतीम मिसळ!

अर्थात ही तीन श्रद्धास्थानं सोडून पुण्यात इतरही अनेक ठिकाणी मिसळी मिळतात. टिळकरोड वरच्या 'रामसर' मधली नाका-तोंडातून धूर आणणारी 'ज्वलंत' मिसळ असो वा अनेक उडप्यांकडे मिळणारी 'सांबार'युक्त मिसळ... खरी पुणेरी मिसळ खाण्याची तीनच श्रद्धास्थानं... श्री, श्रीकृष्ण आणि बेडेकर!

Sunday, January 22, 2006

माहितीजालावर प्रादेशिक बातमीपत्र! [Online News Marathi]

भक्तिसंगीत ऐकण्यासाठी चकत्या/माहितीजालावर उपलब्ध असे दुसरेही पर्याय आहेत, पण बातमीपत्र ऐकायला मात्र काही पर्याय मिळत नव्हता. काही दिवसांपूर्वी एका परिचितांकडून हा प्रादेशिक बातम्यांचा दुवा मिळाला. इथे पुणे केंद्रावर सकाळी ७.०५ मिनिटाने तसेच मुंबई केंद्रावरील दुपारी १.४५ मिनिटाने प्रसारित झालेल्या बातम्या ऐकावयास मिळतात. फार नाही पण ८ ते ९ मिनिटाच्या बातम्या ऐकायला मिळतात. या बातम्यांसोबत सुरू झालेली सकाळ खरोखरच प्रसन्न वाटते. भारताबाहेर असणाऱ्या मराठी भाषिकांना याचा नक्कीच लाभ घेता येईल. (इथे इतर भाषेतूनही बातमीपत्र उपलब्ध आहे). ( manogat)

chk this link to listen online marathi news, ( also in other indian languages ).

Listen Online Radio Here.

- [An2]

Friday, January 20, 2006

मराठीत पाट्या झळकणार!

आजच सकाळमध्ये ही बातमी वाचून बरे वाटले. मराठीला महाराष्ट्रात तरी आता बरे दिवस येतील असे वाटते. ही बातमी वाचून चर्चा व्हावी ह्य उद्देशाने मुद्दाम ही बातमी येथे उतरवून ठेवली आहे. मला लक्षवेधक वाटलेल्या मुद्द्यांना मी अधोरेखित केले आहे.

सकाळमधील बातमी : मराठीत पाट्या झळकवा; अन्यथा पाच हजारांचा दंड भरा..
कामगार उपायुक्तांचा इशारा
पुणे, ता. १७ : 'दुकाने अथवा विविध संस्थांच्या पाट्या मराठीत लिहा; अन्यथा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा भोगा,' असा इशारा कामगार उपायुक्तांनी दिला आहे. .......
....... गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि समर्थ मराठी संस्थेने यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर शहरातील वीस हजारांहून अधिक दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत (देवनागरी लिपीत) झळकल्या आहेत.मुंबई दुकाने संस्था अधिनियम आणि महाराष्ट्र दुकाने अधिनियमानुसार सर्व दुकाने, व्यापारी संस्था, उपाहारगृहे, करमणुकीची ठिकाणे आदींच्या नावांची पाटी मराठीत असणे बंधनकारक आहे. तसे नसल्यास किमान एक हजार व कमाल पाच हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यात असल्याचे कामगार उपायुक्त प्र. रा. शिंदे यांनी कळविले आहे.

अर्थात मराठीतील नावाचा फलक हा इतर भाषेतील फलकापेक्षा जास्त आकाराचा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.समर्थ मराठी संस्थेने याबाबत गेले काही दिवस सातत्याने प्रयत्न केले होते. ''मराठीत फलक नसलेल्या अनेक बँका, महाविद्यालये, वित्तसंस्था, उपाहारगृहे, पानपट्टी चालकांना याबाबत लेखी कळविण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून काहींनी मराठीत फलक लावले. इतरांच्या विरोधात कामगार उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली. या कार्यालयाने संबंधितांना इशारा दिल्यानंतर मराठीचे फलक झळकू लागले,'' अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल गोरे यांनी दिली.

अर्थात सर्वाधिक परिणाम हा शिवसेनेच्या आंदोलनाचा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीत फलक नसलेल्या काही दुकानांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. केवळ इंग्रजीत असलेले वीस हजार फलक मराठीतही दिसू लागले.

मी तुला म्हटलंच होतं...

Another Poem from Manogat.com, I Love this Poem..by Tushar Joshi, nagpur.
- An2

"मी तुला म्हटलंच होतं
तुला राहवणार नाही
एक दिवस अनावर होऊन
तूच सांगशील सगळं काही

मी तुला म्हटलंच होतं
सोपं नाही दूर राहणं
आपल्यात थोडं शिल्लक आहे
सुख दुःख देणं घेणं

मी तुला म्हटलंच होतं
तू नाही म्हटलं तरी
तुझं माझं नातं होणार
दाट खोल केव्हा तरी" ...by - Tushar Joshi, Nagpur..

-- :: Another Poem By Tushar Joshi ::

खात्री आहे तू पुन्हा भेटशील
नेहमी प्रमाणे गोड हसशील
काय झालंय? सवाल करशील
मी तुझ्यापासून तुलाच मागणार आहे
मी तुला सगळं सांगणार आहे

अश्चर्याने मागे सरशील
कदाचित तू नाही म्हणशील
किंवा कदाचित माझ्याकडून
असली अपेक्षाच नव्हती म्हणशील
तुझा कसलाही निर्णय
मला केवळ छळणार आहे
तरीही मी न लपवता
मनात चाललेली ढवळाढवळ
तुला दाखवणार आहे
मी तुला ढवळणार आहे
मी तुला सगळं सांगणार आहे

तुझ्याशी भेट
योगायोग कसा म्हणू?
का गुंतलो?
जन्माजन्माचं नातं आहे जणू?
मला पार वेडावलं आहे
या प्रश्नाने
हे वादळ पेलणार नाही मी एकट्याने
माझ्याबरोबर तुलाही यात ओढणार आहे
मी तुला सगळं सगळं सांगणार आहे..

Thursday, January 19, 2006

प्रेम इतकं अवघड का असतं..

प्रेम इतकं अवघड का असतं

समजायला, उमजायला, व्यक्त करायला

असं नक्की काय असतं त्यात

की लागते ती इतकी आवडायला


चार-दोन मोकळ्या गप्पा, जूळते सूर

पूढची भेट कधी वाटणारी हूरहूर


नंतर मग नुसतं डोळ्यांनी बोलणं

या मनीचं त्या मनी, कोण्या जन्मीचं देणं


काही न घेता तिला देण्याची आस

बाकी काही नको, फ़क्त तू अशीच हास


निस्वार्थी, निरागस, निर्मळ असं प्रेम हवं

प्रेमात पडावं अणि फ़क्त ते अनुभवावं!

-प्रणव

विठ्या तुला ठाउक आहे का?

विठ्या तुला ठाउक आहे का?

विठ्या तुला ठाउक आहे का?
तुक्या आंबिले हा कुणब्याचा
आणि ज्ञानबा कुलकर्ण्याचा
महार चोख्या
नाम्या शिंपी
तर सावत्या माळ्याचा
अन् नरहर सोनाराचा...

चिडून जाऊ नकोस इतका
जात काढली त्यांची म्हणुनी,
हात काढ त्या कमरेवरुनी
आणि मला तू सांग विठोबा,
खरेच तुज ठाउक होती का,
जात तुझ्या संतांची?


......
बैरागी